Wednesday, 1 January 2014

।। जय शंभुराजे ।।


छ : छंद तुझा करी मृत्युला बेधुंद
त्र : त्रस्त झाला मृत्यु पाहुन डोळे लालबुदं
प : पचवीले विष तु धर्मासाठी
ती : तीर्थस्वरुप दैवत मराठ्याचें
रा : राखीला धर्मतु आमच्यासाठी
जे : जेव्हां कोपला सैतान तुटला स्वराज्यावर
सं : संभाळली दौलत मराठी तळहातावर
भा : भागवीली तहान शत्रुच्या रक्तावर
जी : जीवाशि खेळनाऱ्या शिवबाचा तु पुत्र
म : मशाल तुच क्रांतीची बलीदानाचे सुत्र
हा : हार न मननारा
रा : राजाच राजेपन जाणनारा
जा : जातीचा वाघ तु मर्द मराठा
ना : नाही जन्मलाअसा तुच एकटा
मा : माघार नाही मंजुर तुला
ना : नाही सैतानापुढे तु झुकला
चा : चारही दिशा तुझाच धाक
मु : मुगलाचां तुएकमेव बाप
ज :जय जय जयकार तुझा
रा : राजा एकटा शंभु माझा
जय जिजाउ
जय शिवराय

।। जय शंभुराजे ।।


छ : छंद तुझा करी मृत्युला बेधुंद
त्र : त्रस्त झाला मृत्यु पाहुन डोळे लालबुदं
प : पचवीले विष तु धर्मासाठी
ती : तीर्थस्वरुप दैवत मराठ्याचें
रा : राखीला धर्मतु आमच्यासाठी
जे : जेव्हां कोपला सैतान तुटला स्वराज्यावर
सं : संभाळली दौलत मराठी तळहातावर
भा : भागवीली तहान शत्रुच्या रक्तावर
जी : जीवाशि खेळनाऱ्या शिवबाचा तु पुत्र
म : मशाल तुच क्रांतीची बलीदानाचे सुत्र
हा : हार न मननारा
रा : राजाच राजेपन जाणनारा
जा : जातीचा वाघ तु मर्द मराठा
ना : नाही जन्मलाअसा तुच एकटा
मा : माघार नाही मंजुर तुला
ना : नाही सैतानापुढे तु झुकला
चा : चारही दिशा तुझाच धाक
मु : मुगलाचां तुएकमेव बाप
ज :जय जय जयकार तुझा
रा : राजा एकटा शंभु माझा
जय जिजाउ
जय शिवराय

Thursday, 15 August 2013

स्वराज्य


"स्वराज्याची खरी दौलत,
मायेने कमवली,
'जीवा' ला जीव देणारी माणसं,
शिवरायांनी जमवली"..
स्वराज्याचा वटवृक्ष,
पुणवेच्या चंद्राप्रमाणे वाढत गेला..
एकेक माणुस जोडत गेला,
पदोपदी इतिसास घडत गेला...
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराय...

Sunday, 28 July 2013


किल्ले म्हणजे तुम्हा आम्हासाठी मंदिरच

किल्ले म्हणजे तुम्हा आम्हासाठी मंदिरच. जिथे गेल्यावर आपल्या पूर्वजांचा इतिहास आठवून आपली छाती नकळत अभिमानाने फुलतेच. या किल्ल्यांविषयी बऱ्याच जणांना माहित नसते ते म्हणजे नक्की किल्ल्यांचे प्रकार किती अन कोणते? किल्यांमध्ये वेगळेपण ते काय? बांधणी साठी कोणत्या बाजूचा विचार केला जातो? किल्ल्यांमध्ये काय काय वास्तु असतात? चल तर मग जाणून घेऊया या बद्दल थोडे. शत्रूंपासून संरक्षण करण्यास सुलभ जावे आणि सभोवतालच्या प्रदेशावर नियंत्रण ठेवता यावे, म्हणून बांधलेल्या वास्तू इंग्रजीत कॅसल, फोर्ट, सिटॅडल, बर्ग वगैरे संज्ञांनी उल्लेख होतो, तर मराठीत दुर्ग, गिरिदूर्ग, द्वीपदुर्ग, जंजिरा, गढी, कोट, गड, बालेकिल्ला वगैरे संज्ञांनी या वास्तूचे वेगवेगळे प्रकार दर्शविले जातात. किल्ल्यांचे बांधकाम व उपयोग फार प्राचीन काळापासून सर्व जगभर होत आला आहे. ज्या काळी अनपेक्षित परचक्राची भीती असे, त्या काळी घरे, मंदिरे, नगरे इ. तटबंदी वा कोट बांधून सुरक्षित ठेवण्याची प्रवृत्ती होती. शत्रूचा हल्ला आल्यास नागरिकांना त्वरित संरक्षण मिळावे व शत्रूशी मुकाबला करण्यास सोयीचे व्हावे, म्हणून बहुतेक नगरे किल्ल्याच्या आसपास किंवा अनेक वेळा किल्ल्यातच वसवीत. नगराप्रमाणे कधी देशाच्या सीमेवरही तटबंदी करीत. चीनची भिंत हे त्याचेच प्रसिद्ध उदाहरण होय. किल्ल्यात पाणीपुरवठा, गुप्त खजिने, धान्यगुदामे, शास्त्रागारे, दारूची कोठारे, गुप्त मार्ग इत्यादींची अत्यंत चातुर्याने व काळजीपूर्वक आखणी करावी लागे. किल्ला अभेद्य रहावा, म्हणून त्या वेळच्या युद्धपद्धतीनुसार बुरूज, दरवाजे, तटबंदी, तटबंद माची, खंदक वगैरेंची रचना करीत. एवढेच नव्हे, तर युद्धप्रसंगी शस्त्रास्त्रे सहजसुलभतेने हाताळता यावीत म्हणूनही काही खास योजना आखण्यात येत. प्राचीन पाश्चात्य व पौर्वात्य साहित्यात किल्ल्यांचे अनेक प्रकार वर्णिलेले आहेत. परंतु वास्तुशास्त्राच्या दृष्टीने तीनच प्रकार संभवतात, ते म्हणजे भुईकोट किल्ला, गिरिदुर्ग किंवा डोंगरी किल्ला आणि द्वीपदुर्ग किंवा जंजिरा. किल्ल्यांच्या स्थानावरून आणि बांधणीच्या पद्धतीवरून अमिलापितार्थचिं तामणी हया ग्रंथाचा कर्ता सोमेश्वर ह्याने किल्ल्यांचे नऊ प्रकार पाडलेले आहेत; ते म्हणजे जलदुर्ग, गिरिदुर्ग, अश्मदुर्ग, इष्टिकादुर्ग, मृत्तिकादुर्ग, वनदुर्ग, मरूदुर्ग, दारूदुर्ग व नरदुर्ग होत. हया प्रत्येकाची बांधणी काही एका विशिष्ट नैसर्गिक परिस्थितीत केलेली असे आणि किल्ल्यांसाठी स्थलसंशोधन करताना दुर्गमता व विपुल जलसंचय यांवर विशेष भर दिला जात असे. बहुतेक भुईकोट किल्ल्यांची रचना सपाट जमिनीवर किंवा कृत्रिम छोटया पठारवजा टेकडीवर केलेली असते. किल्ल्यांचा आकार चौकोनी, गोलाकार, षट्कोनी किंवा अष्टकोनीही असतो. किल्ल्याभोवतीचा तट दगडविटा, चुना व माती यांचा वापर करून मजबूत केलेला असतो. काही ठिकाणी तटाबाहेर सभोवती खंदक खणून व त्यात पाणी खेळवून विषारी वनस्पती लावण्यात येते. कधी अल्प अंतरावर दोन किंवा तीन खंदकही असत. पुष्कळदा तटाच्या आतही आणखी एखादी साहा तटबंदी असे. तटाची उंची सर्वसाधारणतः १० ते १२ मी. वा त्याहून अधिक आणि रूंदी १ मी. पासून ते रथ वा इतर वाहन सहज रीत्या जाऊ शकेल, एवढी आढळते. तटावर बुरूज, मनोरे हयांचेही निरीक्षणाच्या व संरक्षणाच्या दृष्टीने बांधकाम करण्यात येई. गिरिदुर्गाचे बांधकामही हया पद्धतीने केले जाई; मात्र तटाची उंची व रूंदी भुईकोटापेक्षा कमी असे. काही ठिकाणी तुटलेल्या कडयाचा उपयोग किरकोळ बांधकाम करून तटासारखा करण्यात येई आणि बांधकामासाठी मुख्यत्वे दगडाचाच उपयोग अधिक करीत. तीच गोष्ट जलदुर्गाच्या बाबतीत आढळते. मात्र जलदुर्गाचे तट अधिक रूंद व शिसे अथवा चुना हयांचा उपयोग करून अधिक मजबूत करण्यात येत. बहुधा सतत धडकणाऱ्या पाण्याच्या लाटांपासून किल्ल्याच्या तटांना तडा जाऊ नये, हा त्यामागील उद्देश असे. एकूण वरील प्रकारे किल्ल्यात बुरूज, मेट (पहारा), चिलखत (बुरूजामागील संरक्षक फळी-भिंत), पडकोट (बाहेरील भिंत), मनोरे हयांबरोबरच गढी, माची (संरक्षणाचा एक भाग, खलबतखाना (गुप्त गोष्टींची खोली), अंबारखाना (धान्य कोठार), बालेकिल्ला वगैरे महत्त्वाच्या वास्तू असत. किल्ल्यांच्या दरवाजांना व बुरूजांना किल्ल्याच्या बांधणीत अनन्यसाधारण महत्त्व असे. कारण संरक्षणाच्या दृष्टीने हया दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या होत. दरवाजे लाकडी व लोखंडी पट्ट्यांनी मजबूत केलेले असत व त्यांवर अणकुचीदार मेखा किंवा खिळे लावलेले असत. दरवाजे एक किंवा अधिक असत व शिवाय चोरदिंडया किंवा दिंडी दरवाजे असत. आत आडणे (अडसर) असत. दरवाजांना दिशासूचक नावे दिलेली असत. शिवाय विघ्नहारक व यशदायक अशा सूर्य, चंद्र, गणपती इत्यांदीच्या आकृती दरवाज्यांच्या ग मध्यभागी वसविलेल्या असत खेरीज विहिरी, बाजारपेठ, राहण्याची घरे, राजवाडा, मंदिर, सभागृह, तुरूंग इ. लहानमोठ्या वास्तू असत. किल्ल्याच्या बांधणीत चुना, दगड, वीट, माती, लोखंड व लाकूड हयांचा सर्रास वापर केलेला दिसतो. दरवाजासाठी आणि इतर बांधकामात लाकडाचा उपयोग करीत, परंतु मध्ययुगात बंदुकीच्या दारूचा शेध लागल्यानंतर लाकडाचा उपयोग हळूहळू कमी होत गेला. बाण व बंदुका यांसाठी बुरूज व तट छिद्रे ठेऊन तयार करीत. या छिद्रांना जंग्या म्हणत. बंदुका येथे खोचून शत्रूवर मारा केला जाई. त्यांवरील सपाट जागा तोफ डागण्यासाठी वापरीत. बुरूजांना देखील नावे दिली जात. गिरिदुर्गाच्या बांधणीत दगडाचाच उपयोग अधिक दिसतो. एकंदरीत बदलत्या कालमानाप्रमाणे आणि शस्त्रास्त्रांत ील सुधारणांबरोबर किल्ल्यांचे स्वरूप बदलून ते सचिवालय, राजवाडे, करमणुकीची पटांगणे आणि क्रीडांगणे, अतिथिगृहे, बागा, प्रेक्षागृहे, हमामखाने अशा विविध सुखसोयींनी सज्ज करण्यात आले. किल्ल्यांची बांधणी जगात प्रथम केव्हा सुरू झाली, ह्याचा इतिहास ज्ञातनाही. ईजिप्शियन संस्कृतीच्या (३५०० ते ६०० इ. स. पू.) काळात राजवाडे तटबंदीने, बुरूजांनी व त्याभोवतीच्या खंदकांनी सुरक्षित केलेले असत. बाराव्या राजवंशाच्या वेळी (२०००-१७८६ इ. स. पू.) सेम्ना हा किल्ला बांधण्यात आला. तीच परंपरा पुढे चालू राहिली. ऍसिरियात (इ. स. पू. आठवे-सातवे शतक) तर शहरांना तटबंदी करीत. खोर्साबाद हे त्यातील प्रसिद्ध शहर होय. बॅबिलोनियातही (१८००-५०० इ. स. पू.) ह्यात पद्धतीने तटबंदी करून शहरे बसविली जात. ग्रीकांचा (इ. स. पू. सहावे- पाचवे शतक) टायरिन्झ हा बालेकिल्ला, तसेच अक्रॉपलिस हा अथेन्समधील किल्ला प्रसिद्ध आहे. पुढे रोमन काळात किल्ल्यांना अधिक महत्त्व प्राप्त झाले व राजवाडे म्हणजे लहानमोठे भुईकोट किल्लेच तयार होऊ लागले. यूरोपमधील बहुतेक किल्ल्यांच्या बांधणीत ग्रीको-रोमन तसेच गॉथिक वास्तुशैली मुख्यत्वे आढळते. यूरोपात १००० ते १५०० या कालखंडात किल्ल्यांचे प्रमाण वाढले; ते नॉर्मनांच्याच प्रोत्साहनामुळे झाले. शिवाय ह्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे सरंजामशाही व धर्मयुद्धे. त्यामुळे हेडिंगहॅम, कोल्वेस्टर, पेम्ब्रोक, डील, केनिलवर्थ, कॉन्वे, ऍरंडल, डोव्हर, एडिनबर, विंझर (इंग्लंड), कूसी- ल-शातो, दे शॉंबॉर (फ्रान्स), ब्रॉनफेल्स (जर्मनी), म्युरेन (नेदर्लंड्स), सांत आंजीलो (इटली), आल्काथार (स्पेन), रूमेली हिस्सार (तुर्कस्तान), क्रॅक डेस शिव्हॅलिअर्स (सिरिया), कौंतस ऑफ लेंडर्स (बेल्जियम), कल्मार स्वीडन हयांसारखे प्रसिद्ध किल्ले हया युगात बांधले गेले. हयांतच पुढे काही सुधारणा करण्यात आल्या आणि आयलिन डोनान, ऍरंडल, ब्लार्ना, कर्नारव्हन, गेलर्ड वगैरे काही किल्ले; तसेच मेझन्स, लाफीत, शनाझो, आझे-ल-रिदो वगैरे प्रबोधनकाळातील किल्ल्यांची डागडुजी करण्यात आली. पहिल्या महायुद्धात काही किल्ले जमीनदोस्त झाले. अद्यापि ह्यांतील अनेक किल्ल्यांचे अवशेष पहावयास सापडतात. रशियातील क्रेमलिन हे अशा बालेकिल्ल्यांचे उदाहरण म्हणावे लागेल. किल्ल्यांचा उल्लेख प्राचीन भारतीय वाङ्मयात आढळतो. ऋग्वेद, मनुस्मृति, कौटिलीग अर्थशास्त्र, महाभारत (शांतिपर्व), पुराणे ह्यांसारख्या ग्रंथांतून दुर्ग, त्यांचे प्रकार आणि महत्त्व ह्यांचे विवेचन आढळते. प्राचीन भारतात सिंधु नदीच्या खोऱ्यात हडप्पा ह्या शहरास तटबंदी होती व शहराच्या मध्यभागी बालेकिल्ला बांधला होत असे तेथील अवशेषांबरून दिसते. पुढे वेदकाळात, तसेच ब्राह्मणकाळात शहरांभोवती तटबंदी उभारून सभोवती खंदकांची योजना केली जात असे. ऋग्वेदात ह्याचा `पुर' हया शब्दाने उल्लेख केलेला आढळतो. ऐतरेय ब्राह्मणात अनेक किल्ल्यांचा उल्लेख असून तीन अग्नी हे तीन किल्ले असून असुरांपासून यज्ञाचे संरक्षण करीत आहेत, असे वर्णन केले आहे. मौर्यकाळात कौटिलीय अर्थशास्त्रातील किल्ल्यांच्या स्थापत्यविषयक वर्णनावरून असे दिसते, की किल्ल्यांची बांधणी एका विशिष्ट पद्धतीने करण्यात येई. पाटलिपुत्र शहराच्या अवशेषांवरून असे दिसते, की त्याभोवती खंदक होता आणि त्याची तटबंदी भक्कम असावी. गुप्त, वाकाटक, राष्ट्रकुट ह्यांच्या काळात किल्ल्यांस विशेष महत्त्व आलेले नसले, तरी त्यांचे राजवाडे व शहरे तटबंदीने युक्त असत. मुसलमानपूर्व काळात चालुक्य, शिलाहार, यादव हया वंशांच्या वेळी गिरिदुर्गांचे महत्त्व अनन्यसाधारण वाढले. एकूण किल्ल्यांपैकी ह्या काळात बांधलेल किल्ले- त्यांचे मूळ स्वरूप आज दिसत नसले तरी- संख्येने सर्वाधिक भरतील. देवगिरी (दौलताबाद), साल्हेर-मुल्हेर, अंकाई-टंकाई, अंजनेरी, मार्कंडा, त्रिंबक, रांगणा, पावनागड, पन्हाळा, विशाळगड हे कुसलमानपूर्वकाळातील किल्ले होत. पुढे मुसलमान काळात अनेक किल्ले बांधण्यात आले. दिल्लीचा लाल किल्ला, आग्र किल्ला, अहमदनगरचा किल्ला, विजापूरचा किल्ला, बंगलोरचा किल्ला ही तत्कालीन भुईकोट किल्ल्यांची प्रसिद्ध उदाहरणे होत. तत्कालीन राजपुतांनी चितोड, आंबेर, जोधपूर, ग्वाल्हेर इ. डोंगरी किल्ले बांधले. सतराव्या शतकात महाराष्ट्रात शिवाजीने अनेक नवीन किल्ले बांधले आणि काही जुने किल्ले डागडुजी करून इमारती, तळी, तटबंदी यांची योजना करून लढाऊ बनविले. राजगड, रायगड, पुरंदर, तोरणा, विशाळगड, पन्हाळा, प्रस्तापगड इ. डोंगरी किल्ले व सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, जयदुर्ग, खांदेरी, सुवर्णदुर्ग, अरनाळा, कुलावा, जंजिरा, पद्मदुर्ग, जयगड इ. जलदुर्ग होत. पुढील काळात शिवाजीने बांधलेल्या किल्ल्यांचीच डागडुजी करण्यात आली. मात्र हयावेळी यूरोपीय वसाहतवाद्यांनी भारताच्या भूमीवर पाय रोवले होते. त्यांनी स्वसंरक्षणासाठी फोर्ट विल्यम, फोर्ट सेंट जॉर्ज, फोर्ट सेंट डेव्हिड, आग्वाद त्रांकेबार वगैरे किल्ले बांधलेत्र ह्या काळात गोवळकोंडा, त्रिचनापल्ली, पेनुगोंडे, चंद्रगिरी येथील किल्ल्यांनाही महत्त्व प्राप्त झाले. वरील काळात राजधानीच्या शहराव्यतिरिक्त जहागीरदार-वतनदारांच्या गावात, त्या त्या वतनदारांनी बांधलेल्या गढ्या या होत

इतिहास


राजगडा संबधीचे उल्लेख

१)‘राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले अभेद्य स्वरूपाचे असून
अशा ठिकाणी वसले आहेत
की मावळयांचा नेता शिवाजी याला राज्यविस्तारासाठी किल्ल्यांचा भरपूर
उपयोग झाला‘.
- जेम्स डग्लस(बुक ऑफ बॉम्बे)

२) साकी मुस्तैदखान त्याच्या मासिरे आलिमगिरे नावाच्या ग्रंथात
म्हणतो ‘राजगड हा अतिशय उंच त्याची उंची पाहता सर्व
किल्ल्यात तो श्रेष्ठ होय असे म्हणता येईल. त्याचा घेर १२
कोसांचा आहे. त्याच्या मजबूतीची तर कल्पनाही करवत नव्हती.
डोंगराच्या दर्याखोर्यातून आणि घनघोर अरण्यातून वार्याशिवाय
दुसरे काही फिरकू शकत नाही. येथे पावसालाच फक्त वाट मिळू
शकते. इतर कोणीही त्यातून जाऊ शकत नाही.‘

३) महेमद हाशिम खालीखान याने ‘मुन्तखबुललुबाबएमहेमदॉशाही
नामक ग्रंथामध्ये म्हणतो,‘राजगड किल्ल्याचे मी कसे वर्णन करु ?
काय त्या किल्ल्याची उंची, काय त्यांचा विस्तार !जणू
काही आकाशच पसरले होते. त्याचे टोक पाहून छाती दडपे.
त्याच्या भाराने पृथ्वी धारण करणारा पाताळातील वृषभ ओरडत
असावा. त्या भागात सापांचा सुळसुळाट होता. जिकडे तिकडे
निरनिराळ्या प्रकारचे हिंस्त्र पशु दिसत, त्यामुळे सगळे त्रस्त
होऊन गेले. राजगड किल्ला म्हणजे डोंगराची रांग, त्याचा घेर
बारा कोसांचा, त्याला सगळीकडून वेढा घालणे कठिण होते
इतिहासातून अस्पष्टपणे येणार्या उल्लेखांवरुन सातवाहनपूर्व
म्हणजे साधारण २००० वर्षा पूर्वी पासूनचा हा डोंगर ज्ञात आहे.
ब्रम्हर्षी ऋषींचे येथे असणारे वास्तव्य व याच
ब्रम्हर्षी ऋषींच्या नावावरुन येथे स्थापन झालेले
श्री ब्रम्हर्षी देवस्थान यावरुन डोंगर फार पुरातन असावा.
राजगडाचे पूर्वीचे नाव होते "मुरंबदेव".

हा किल्ला बहामनी राजवटी मध्ये याच नावाने ओळखला जात असे.
अर्थात त्यावेळी गडाचे स्वरूप फार काही भव्य दिव्य असे नव्हते.
इसवी सन १४९० च्या सुमारास
अहमदनगरच्या निजामशाहीचा संस्थापक अहमद बहिरी याने वालेघाट
आणि तळकोकणातील अनेक किल्ले जिंकून पश्चिम महाराष्ट्रात
प्रभाव निर्माण केला आणि याच वेळी त्याने मुरूंबदेव
हा किल्ला हस्तगत केला. मुरूंबदेवाचे गडकरी बिनाशर्त शरण
आल्यामुळे अहमद बहिरीला किल्ला जिंकण्यास विशेष प्रयास करावे
लागले नाहीत. पुढे किल्ल्यावर निजामशाहीची सत्ता प्रस्थापित
झाल्यावर १२५ वर्षे किल्ल्यावर कोणाचाही हल्ला झाला नाही.
इसवी सन १६२५ च्या सुमारास मुरूमदेव किल्ला निजामशाही कडून
आदिलशही कडे आला. निजामशहाच्या वतीने बाजी हैबतराव
शिलीमकर व त्याचे वडील रुद्राजी नाईक
या किल्ल्याची व्यवस्था पाहात होते. मलिक अंबरच्या आदेशानुसार
बाजी हैबरावाने मुरुमदेवाचा ताबा आदिलशाही सरदार हैबतखामाकडे
दिला.

इ.स. १६३० च्या सुमारास हा किल्ला आदिलशहाकडून परत
निजामशाहीत दाखल झाला.
शहाजीराजांचा अधिकारी सोनाजी या किल्ल्याचा कारभार पाहू
लागला. विजापूर आदिलशाही सैन्याच्या एका तुकडीने किल्ल्यावर
हल्ला केला. त्यात सोनाजी जखमी झाला म्हणून बालाजी नाईक
शिळीमकर आपल्या तुकडीसह मुरुमदेवाच्या रक्षणार्थ धावून गेला.
तेव्हा बालाजी नाईक जखमी झाला. या कामगिरी बद्दल
शहाजीराजांनी बाळाजी नाईक शिलीमकरांचा नंतर सन्मानही केला.
शिवरायांनी मुरुमदेवाचा किल्ला कधी घेतला याचा लिखीत पुरावा आज
उपलब्ध नाही. शिवचरित्र साहित्य खंडाच्या दहाव्या खंडात
प्रसिद्ध झालले एक वृत्त सांगते की, ‘शिवाजीने शहामृग
नावाचा पर्वत ताब्यात घेऊन त्यावर इमारत बांधली‘.
सभासद बखर म्हणतो की,
‘मुराबाद म्हणोन डोंगर होता त्यास वसविले. त्याचे नाव राजगड
म्हणोन ठेविले. त्या गडाच्या चार माच्या वसविल्या. सभासदाने
बालेकिल्ल्याला सुद्धा एक माची म्हणून गणली आहे‘.
सन १६४६ ते १६४७ च्या सुमारास शिवरायांनी तोरणा किल्ल्यासोबत
हा किल्ला जिंकून घेतला. हा किल्ला बांधण्याचे काम
महाराजांनी मोठ्या झपाट्याने सुरु केले. त्या डोंगरास तीन
सोंडा किंवा माच्या होत्या, त्यासही तटबंदी केली. मुख्य किल्ल्यास
राजगड नाव ठेवून एक इमारत उभी केली. तीन माच्यांना सुवेळा,
संजीवनी आणि पद्मावती ही नावे दिली. शिरवळ नजीक खेडबारे
नावाचे गाव होते, तेथे रान फार होते.

त्या ठिकाणी फर्माशी आंब्याची झाडे लावून पेठ वसविली व तिचे
नाव शिवापूर असे ठेवले. इसवीसन १६६० मध्ये
औरंगजेबाच्या आज्ञेनुसार शाहिस्तेखानाने
शिवाजी महाराजांच्या प्रदेशावर स्वारी केली. फारसी साधनांमधून
अशी माहिती मिळते की शाहिस्तेखानाने राजगडाकडे फौज
पाठविलेली होती. ह्या फौजेने
राजगडाच्या जवळपासची काही खेडी जाळून उध्वस्त केली. परंतु
प्रत्यक्ष राजगड किल्ला जिकंण्याचा प्रयत्न मात्र केला नाही. ६
एप्रिल १६६३ रोजी शाहीस्तेखानावर छापा घालून शिवाजी महाराज
राजगडावर परतले.
सन १६६५ मध्ये मिर्झाराजा जयसिंग याने शिवरायांच्या प्रदेशावर
स्वारी केली दाऊदखान आणि रायसिंग या दोन सरदारांना त्याने
या परिसरातील किल्ले जिंकण्यासाठी पाठविले. ३० एप्रिल १६६५
रोजी मुगल सैन्याने राजगडावर चाल केली, परंतु
मराठ्यांनी किल्ल्यावरुन विलक्षण मारा केल्या मुळे मुगलांना माघार
घ्यावी लागली.

शिवाजी महाराजांनी जयसिंग बरोबर तह करताना २३ किल्ले देण्याचे
मान्य केले व स्वत:कडे १२ किल्ले ठेवले. या १२ किल्ल्यांमध्ये
राजगड, तोरणा, लिंगाणा, रायगड यांचा समावेश होतो. सभासद
बखरीतील उल्लेख खालील प्रमाणे आहे
‘सत्तावीस किल्ले तांब्रास दिले निशाणे चढविली वरकड राजगड व
कोट मोरोपंत पेशवे व निलोपंत मुजुमदार व नेताजी पालकर सरनोबत
असे मातुश्रींच्या हवाली केले व आपणही दिल्लीस जावे,
बादशाहाची भेट घ्यावी असा करार केला‘.
शिवाजी महाराज आग्र्याहून निसटून निवडक लोकांनिशी १२ सप्टेंबर
१६६६ ला राजगडाला सुखरुप पोहोचले. २४ फेब्रुवारी १६७०
रोजी राजगडावर राजारामचा जन्म झाला. सिंहगड
किल्ला घेण्यासाठी शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसुरे यास
राजगडावरुनच १६७० मध्ये पाठविले. सन १६७१- १६७२ मध्ये
शिवाजी महाराजांनी रायगड स्थान राजधानी साठी निश्चित केले
आणि राजधानी रायगडावरुन राजगडाकडे हलविली.
३ एप्रिल १६८० रोजी शिवरायांचे निधन झाल्यावर स्वराज्यावर
औरंगजेबाच्या स्वारीचे संकट कोसळले. ११ मार्च १६८९
रोजी संभाजी महाराजांना पकडून ठार मारण्यात आले.

यानंतर मुगलानी मराठ्यांचे अनेक गड जिंकून घेण्याचा प्रयत्न केला.
किशोरसिंह हाडा या मुगल सरदाराने जून १६८९ मध्ये राजगड जिंकून
घेतला. औरंगजेबाने अबुलखैरखान याला राजगडाचा अधिकारी म्हणून
नेमले. मात्र अद्याप
संभाजी महाराजांना पकडल्याची वार्ता पसरली नव्हती. त्यामुळे
मराठ्यांची फौज राजगडाभोवती गोळा झाली. आणि आपल्या बळावर
राजगड पुन्हा जिंकून घेतला.
जानेवारी १६९४ मधील एका पत्रात शंकराजी नारायण सचिव याने
’कानद खोर्यातील देशमुखांनी राजगडाच्या परिसरातील प्रदेशाचे
मुगलांच्या हल्ल्यापासून संरक्षण केल्या बद्दल त्यांची इनामे
त्यांचकडे चालवावीत ’ असा आदेश दिला होता.

११ नोहेंबर १७०३ मध्ये स्वत: औरंगजेब
जातीनिशी हा किल्ला जिंकण्यासाठी पुण्याहून निघाला.
औरंगजेबाचा हा प्रवास मात्र सुखकर झाला नाही.
राजगडाच्या अलीकडे चार कोस घाटातला रस्ता आहे. रस्ता केवळ
दुर्गम होता. औरंगजेबाने एक महिना आधी काही हजार गवंडी, बेलदार
आणि कामदार यांना रस्ता नीट करण्याच्या कामावर पाठविले, पण
रस्ता काही नीट झाला नव्हता. त्यामुळे बरेचसे सामान आहे तिथे
टाकून द्यावे लागले. २ डिसेंबर १७०३ रोजी औरंगजेब राजगडा जवळ
पोहोचला. किल्ल्यास मोर्चे लावले. किल्ल्याचा बुरुज तीस गज उंच,
त्याच उंचीचे दमदमे तयार करुन त्यावर तोफा चढविल्या व बुरुजावर
तोफांचा भडीमार करु लागले. तरबियतखान आणि हमीबुद्दीनखान याने
पद्मावतीच्या बाजूने मोर्चे लावले. पुढे दोन महिने झाले
तरी किल्ला काही हातात येत नव्हता. शेवटी ४ फेब्रुवारी १७०३
रोजी राजगड औरंगजेबाच्या हातात पडला. इरादतखान
याला औरंगजेबाने किल्लेदार नेमले आणि किल्ल्याचे नाव
‘नाबिशहागड‘ असे ठेवले.

२९ मे १७०७ रोजी गुणाजी सावंत याने पंताजी शिवदेवा बरोबर
राजगडावर स्वारी करुन तो किल्ला जिंकून
घेतला आणि पुन्हा किल्ला मराठयांच्या ताब्यात आला. पुढे
शाहुच्या ताब्यात किल्ला आल्यावर १७०९ मध्ये शाहुने
सुवेळा माचीस ३०० रुपये व संजीवनी माचीस १०० रुपये
अशी व्यवस्था लावून दिली.
पेशवेकाळात राजगड हा सचिवांच्या ताब्यात होता. पेशवाई मध्ये
आर्थिक परिस्थिती वांरवार बिघडत असल्याने किल्ल्यावर शिबंदीचे
पगारही वेळेवर होत नसत. अशाच परिस्थिती मध्ये राजगडावरील
सेवकांचे पगार एक वर्षभर थकले होते.(राजवाडे खंड १२) यानंतर
राजगड भोर संस्थानाच्या ताब्यात गेला.
त्याची व्यवस्था पाहण्यासाठी सहा अधिकारी नेमले होते.
सुवेळा माचीसाठी सरनोबत शिलीमकर,
पद्मावती माचीसाठी सरनोबतपवार घराण्यातील,
संजीवनी माचीसाठी सरनोबत खोपडे घराण्यातील या शिवाय नाईक व
सरनाईक हे अधिकारी सुद्धा असत.

पहाण्याची ठिकाणे :
पद्मावती तलाव :
गुप्त दरवाजाकडून पद्मावती माचीवर आल्यावर समोरच सुबक
बांधणीचा विस्तीर्ण असा तलाव आढळतो.
तलावाच्या भिंती आजही शाबूत आहेत. तलावात
जाण्यासाठी त्याच्या भिंतीतच एक कमान तयार केलेली आहे.
तलावात सध्या गाळ मोठ्या प्रमाणात साचला आहे.

रामेश्वराचे मंदिर:
पद्मावती देवीच्या मंदिरा समोरच पूर्वाभिमुख असे रामेश्वर मंदिर
आहे. मंदिरातील शिवलिंग शिवकालीन आहे. मंदिरात
असणारी मारूतीरायांची मूर्ती दक्षिणाभिमुख आहे.

राजवाडा:
रामेश्वर मंदिरापासून पायर्यांनी वर जातांना उजवीकडे राजवाड्याचे
काही अवशेष दिसतात. या राजवाड्यामध्ये एक तलाव आहे.
याशिवाय राजवाड्यापासून थोडे पुढे गेल्यावर अंबारखाना लागतो.
याच्या थोडे पुढे सदर आहे. सदरेच्या समोर दारुकोठार आहे.

सदर:
ही गडावरची सर्वात महत्वाची अशी वास्तू आहे. रामेश्वर
मंदिरापासून पायर्यांनी वर गेल्यावर उजव्या हातास राजवाड्याचे
अवशेष आहेत. थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे सदर आहे.
पूर्वी या सदरेत ओटीच्या कडेस मधल्या खणात एक जुना गालिचा व
त्यावर लोड ठेवलेला असे. अनेक इतिहास तज्ज्ञांचे असे मत आहे
की ही सदर नसून तटसरनौबताचे घर आहे.

पाली दरवाजा:
पाली दरवाजाचा मार्ग पाली गावातून येतो. हा मार्ग फार प्रशस्त
असून चढण्यासाठी पायर्या खोदल्या आहेत.पाली दरवाजाचे पहिले
प्रवेशद्वार भरपूर उंचीचे आणि रुंदीचे आहे, यातून
हत्ती सुद्धा अंबारीसह आत येऊ शकतो. हे प्रवेशद्वार ओलांडून
२०० मी. पुढे गेल्यावर भरभक्कम बांधणीचे दुसरे प्रवेशद्वार आहे.
प्रवेशद्वाराचे संरक्षण चांगल्या बुलंद अशा बुरुजांनी केलेले आहे.
या दरवाजाचे वैशिष्ट्य म्हणजे दरवाजाच्या वर आणि बुरुजावर
परकोट बांधलेले आहेत. या परकोंटाना गोल आकाराचे झरोके ठेवलेले
आढळतात. अशा झरोक्यांना ’फलिका’ असे म्हणतात.
या फलिकांचा उपयोग तोफा डागण्यासाठी होत असे. दरवाजातून आत
शिरल्यावर दोन्ही बाजूस पहारेकर्यांच्या देवड्या आहेत.
या दरवाजाने गडावर आल्यावर आपण पद्मावती माचीवर पोहोचतो.

गुंजवणे दरवाजा:
गुंजवण दरवाजा म्हणजे एकामागे एक असलेल्या तीन
प्रवेशद्वारांची एक मालिका आहे. पहिला दरवाजा अत्यंत
साध्या बांधणीचा आहे. मात्र दरवाजाला दोन्ही बाजूस भरभक्कम
बुरुज आहेत. गुंजवणे दरवाजाच्या दुसर्या प्रवेशद्वाराला वैशिष्टपूर्ण
कमान आहे. या दरवाजाच्या शेवटी व गणेश
पट्टीच्या खाली दोन्हीकडे दोन उपडे घट घेतलेल्या व
एका कमलकलिके समोर असलेल्या सोंडा आहेत. सांप्रत
या शिल्पावरुन श्री किंवा गजशिल्प तयार झाले असावे असे अनुमान
निघते. या सर्व गोष्टींवरुन असे अनुमान निघते की, हे प्रवेशद्वार
शिवपूर्वकालात बांधलेले असावे. प्रवेशद्वाराच्या आत
पहारेकर्यांच्या देवड्या आहेत.

पद्मावती माची:
राजगडाला एकूण ३ माच्या आहेत. यापैंकी सर्वात प्रशस्त
अशी माची म्हणजे पद्मावती माची. पद्मावती माची केवळ एक
लष्करी केंद्र नसून निवासाचे ठिकाणही होते. माचीवर बांधकामाचे
अनेक अवशेष सापडतात. पद्मावती देवीचे मंदिर,
सईबाईंची समाधी ,हवालदारांचा वाडा, रत्नशाला, सदर,
पद्मावती तलाव, गुप्त दरवाजा, पाली दरवाजा, गुंजवणे दरवाजा,
दारुगोळ्याची कोठारे या वास्तू आजही शिल्लक आहेत. याशिवाय
पद्मावती माचीवर ब्राम्हणवर्गाची आणि अष्टप्रधान
मंडळाची काही घरे आहेत.

पद्मावती मंदिर :
सध्या २००२ मध्ये या मंदिराचा जीर्णोध्दार केला आहे.
शिवरायांनी किल्ले मुरुंबदेवाचे राजगड म्हणून नामकरण केल्यावर येथे
असलेल्या जागेवर पद्मावती देवीचे मंदिर बांधले असा उल्लेख
आढळतो. सध्या मंदिरात आपल्याला तीन मूर्त्या दिसतात. मुख्य
पुजेचे मूर्ती भोरच्या पंत सचिवांनी स्थापन केलेली आहे.
त्याच्या उजव्या बाजुला लहान असलेली मूर्ती शिवरायांनी स्थापित
केलेली आहे, तर दोन मूर्तीच्या मध्ये शेंदूर फासलेला तांदळा म्हणजे
पद्मावती देवीची मुर्ती आहे.या मंदिरात सध्या २० ते ३०
जणांना राहता येते. मंदिराच्या बाजूसच पाण्याचे टाके आहे. यातील
पाणी पिण्यासाठी योग्य आहे. मंदिराच्या समोरच
सईबांईची समाधी आहे.

संजीवनी माची:
सुवेळा माचीच्या बांधणीनंतर शिवाजीमहाराजांनी या माचीचे बांधकाम
करण्यास सुरवात केली. माचीची एकूण लांबी अडीच किमी आहे.
ही माची सुद्धा ३ टप्प्यांमध्ये बांधलेली आहे. संजीवनी माचीवरील
घरांचे अवशेष आजही अस्तित्वात आहेत. माचीच्या प्रत्येक
टप्प्यास चिलखती बुरुज आहेत. पहिला टप्पा खाली उतरुन उत्तरेकडे
वळून तटालागत थोडे मागे चालत गेल्यावर तीन तिहेरी बांधणीचे बुरुंज
लागतात. या तिन्ही बुरुजावर शिवकालात प्रचंड
मोठ्या तोफा असाव्यात. या माचीवर अनेक पाण्याची टाकी आहेत.
या माचीला एकूण १९ बुरुज आहेत.
माचीला भुयारी परकोटाची योजना केलेली आहे या भुयारातून बाहेरील
तटबंदी कडे येण्यासाठी दिंड्यांची व्यवस्था केलेली आहे.
संजीवनी माचीवर आळु दरवाजाने सुद्धा जाता येते. आळु
दरवाजा पासून राजगडाची वैशिष्टय
असलेली चिलखती तटबंदी दुतर्फा चालू होते. दोन्ही तटांमधील अंतर
अर्धा ते पाऊण मीटर असून खोली सुमारे ६ ते ७ मीटर आहे.
या भागात बुरुजांच्या चिलखतात
उतरण्यासाठी पायर्यांच्या दिंड्या आहेत. तसेच नाळेतून वर
येण्यासाठी दगडी सोपान आहेत. माचीवर तटबंदी मध्ये
काही जागी प्रातर्विधीची ठिकाणे (शौचकुप) आढळतात.
दुहेरी तटबंदीच्या शेवटी बलाढ्य बुरुज आहेत. यांचा उपयोग दूरवर
नजर ठेवण्यासाठी होत असे.

आळु दरवाजा:
संजीवनी माचीवर येण्यासाठी या दरवाजाचा उपयोग होत असे.
तोरणा वरुन राजगडावर येण्याचा एकमेव मार्ग या दरवाजातून जात
असे. आळु दरवाजा सद्यस्थितीला ढासाळलेल्या अवस्थतेत आहे.
या दरवाजावर एक शिल्प आहे. वाघाने एक सांबार उताणे पाडले
आहे,असे चित्र या शिल्पात दाखवले आहे.

सुवेळा माची:
मुरुंबदेवाचा किल्ला ताब्यात आल्यानंतर
शिवाजी महाराजांनी किल्ल्याच्या पूर्वेकडील डोंगररांगेला भरभक्कम
तटबंदी बांधली, आणि माचीला सुवेळा माची असे नाव ठेवले. पूर्वेकडे
ही माची असल्यामुळे या माचीचे नाव "सुवेळा" असे ठेवले.
सुवेळा माची ही संजीवनी एवढी लांब नाही. मात्र या माचीचे सुद्धा ३
टप्पे आहेत. पूर्वेकडे ही माची चिंचोळी होत गेलेली आहे.
माचीच्या प्रारंभी टेकडी सारखा भाग आहे याला "डुबा" असे
म्हणतात. या डुब्याच्या डावीकडून रानातून जाणार्या वाटेने गेल्यावर
शिबंदी घरटे दिसतात. तेथे डाव्या हातास एक दक्षिणमुखी वीर
मारुती व त्याच्या जवळ पाण्याचे टाक आहे. येथे असणारे चौथरे
म्हणजे एके काळी येसाजी कंक, तानाजी मालसुरे व शिलींबकर
या सरदारांची घरे होती. येथून सरळ जाणारी वाट
सुवेळा माचीच्या दुसर्या टप्प्यावर जाते, तर डावीकडे जाणारी वाट
काळेश्वरी बुरुजाच्या परिसरात घेऊन जाते.
आपण माचीच्या दिशेने
थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे एक सदर लागते. येथून पुढे
तटबंदीच्या खरा भाग सुरु होतो. येथील तटबंदी दोन टप्प्यांत
विभागली असून प्रत्येक टप्प्याच्या शेवटी चिलखती बुरुज आहे.
दुसर्या टप्प्यात गेल्यावर तटबंदीच्या दोन्ही बाजूस आतील अंगास
भुयारी चिलखती परकोटाची रचना केलेली आहे. दुसर्या टप्पयाकडे
जातांना एक उंच खडक लागतो आणि या खडकात ३ मीटर व्यासाचे
एक छिद्र आढळते. या खडकालाच नेट किंवा ’हत्तीप्रस्तर’ असे
म्हणतात. या हत्तीप्रस्तराच्या अलीकडे तटातील
गणपती आढळतो व तेथूनच पुढे तटातून खाली जाण्यासाठी गुप्त
दरवाजा आहे. या दरवाजाला "मढे दरवाजा" असे म्हणतात.
हत्ती प्रस्तराच्या पुढील भागात सुद्धा एक असाच गुप्त
दरवाजा आहे. सुवेळा माचीच्या तटबंदीला एकुण १७ बुरुज आहेत.
त्यापैकी ७ बुरुजांना चिलखती बुरुजांची सोय आहे.
सुवेळा माचीच्या सर्वात शेवटच्या टप्प्यात खालच्या भागात
वाघजाईचे शिल्प आहे.

काळेश्वरी बुरुज आणि परिसर:
सुवेळा माचीच्या दुसर्या टप्प्याकडे जाणार्या वाटेच्या उजवीकडे
वळल्यावर आपल्याला पाण्याची काही टाकी दिसतात. पुढे रामेश्वर
मंदिराचे काही अवशेष आहेत. या रामेश्वर मंदिरात शिवलिंग, भग्न
नंदी, एक यक्षमूर्ती अशी शिल्पे आढळतात.या रामेश्वर
मंदिराच्या वरील बाजूस शिलाखंडावर गणेशाची प्रतिमा, पार्वती,
शिवलिंग अशी शिल्पे आहेत. येथून थोडेसे पुढे गेल्यावर
काळेश्वरी बुरुज आहे. येथेच तटात एक गुप्त दरवाजा देखील
आढळतो.

बालेकिल्ला:
राजगडाच्या सर्वात उंच भाग म्हणजे बालेकिल्ला होय.
या बालेकिल्ल्याकडे जाणारा रस्ता कठीण आणि अरुंद आहे. चढण
संपल्यानंतर बालेकिल्ल्याचा दरवाजा लागतो यालाच
महादरवाजा असे ही म्हणतात. आजही दरवाजा चांगल्या स्थितीत
आहे. प्रवेशद्वाराची उंची ६ मीटर असून प्रवेशद्वारावर कमळ,
स्वस्तिक ही शुभचिन्ह कोरलेली आहेत. बालेकिल्ल्याला साधारण १५
मीटर उंचीची तटबंदी बांधलेली असून विशिष्ट अंतरावर बुरुजही ठेवलेले
आहेत.
दरवाजातून आत गेल्यावर समोरच जननीमंदिर आहे. येथून पुढे
गेल्यावर चंद्रतळे लागते. तळ्याच्या समोरच उत्तरबुरुच आहे. येथून
पद्मावती माची आणि इतर सर्व परिसर दिसतो. बुरुजाच्या खालून
एक पायवाट बालेकिल्ल्यावर येते. आता मात्र ही वाट एक
मोठा शिलाखंड टाकून बंद केलेली आहे. ही वाट ज्या बुरुजावरून वर
येते त्या बुरुजाला "उत्तर बुरुज" असे म्हणतात. येथून संपूर्ण
राजगडाचा घेरा आपल्या लक्षात येतो. या उत्तर
बुरुजाच्या बाजुला ब्रम्हर्षी ऋषींचे मंदिर आहे. या शिवाय
बालेकिल्ल्यावर काही भग्न अवस्थेतील इमारती चौथरे, वाड्यांचे
अवशेष आढळतात.

राजगड किल्ला संपूर्ण पाहण्यासाठी साधारण २ दिवस लागतात.
गडावरुन तोरणा, प्रतापगड, रायगड, लिगांणा, सिंहगड, पुरंदर,
वज्रगड, मल्हारगड, रोहीडा, रायरेश्वर आणि लोहगड, विसापूर हे
किल्ले दिसतात.